नवी दिल्ली- जून 8 पासून देशभरामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे हॉटेल चालकांनी स्वागत केले आहे.
लॉक डाऊनमध्ये हॉटेल क्षेत्राने केंद्र सरकारबरोबर सहकार्य करून काम केले आहे. आगामी काळातही आवश्यक ती काळजी घेऊन हे क्षेत्र खुले करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे ओयो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी सांगितले. आम्ही कर्मचाऱ्यांच्या किंवा पाहुण्यांच्या आरोग्याशी कसलीही तडजोड न करता आवश्यक त्या उपाययोजना करून कामकाज सुरू करण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले.
पूर्ण क्षमतेने हे काम सुरू होण्यास काही काळ लागणार असला तरी कर्मचाऱ्याच्या मनामध्ये यामुळे उमेद निर्माण होण्यास मदत होणार आहे. मात्र या उद्योगासमोरील अडचणी जास्त असतांना केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये या क्षेत्राला कसल्याही सवलती मिळाल्या नाहीत. आगामी काळात या क्षेत्रावरील जीएसटी कमी करण्याच्या शक्यतेवर अर्थमंत्रालयाने आणि राज्यानी गंभीरपणे विचार करावा. त्यामुळे आहे तो रोजगार टिकून राहण्यास मदत होईल असे त्यांनी सुचविले.