आठ दिवसांत यूजीसीकडून निर्देशाची अपेक्षा
पुणे – राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षांबाबत आठ दिवसांत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) राज्य सरकारला निर्देश दिले जाणार आहेत. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे ही दिली.
“करोना’ लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. या परीक्षा कशा घ्याव्यात, यासाठी राज्य सरकारने कुलगुरूंची समिती नेमली होती. तसेच “यूजीसी’नेही दोन समित्या नेमल्या होत्या. “यूजीसी’च्या दोन्ही समितींनी त्यांचे अहवाल सादर केले आहेत. त्यात एका समितीने सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे आणि दुसऱ्या समितीने पायाभूत सुविधा चांगल्या असतील, तर ऑनलाइन परीक्षा घ्याव्यात अन्यथा लॉकडाऊन संपण्याची वाट पाहावी, अशी सूचना दिलेल्या आहेत.
दरम्यान, रविवारी “यूजीसी’ने राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला पुढील आठ दिवसांत राज्यात परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात याबाबत कळविले जाईल, असे सांगितले आहे. राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल ही राज्यपाल व सरकारला सादर केला जाणार आहे. दरम्यान, या निर्णयाकडे हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
“यूजीसी’ने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षे बाबत आठ दिवसांत कळवण्यात येईल, असे सांगितले आहे. “यूजीसी’ने निर्णय दिल्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेऊ.
– उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री