“रुसा” अंतर्गत प्रतिदिन १२ लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारणार
पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या सर्व इमारतींमधील सांडपाणी प्रक्रिया करून वापरता यावे यासाठी लवकरच ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची स्थापित क्षमता प्रतिदिन १२ लाख लिटर इतकी असणार आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याची बचत करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान अर्थात “रुसा”अंतर्गत उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे विद्यापीठातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ शकणार आहे. त्याद्वारे विद्यापीठाचे आवार अधिक पर्यावरणपूरक बनेल. तसेच, उन्हाळ्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई दूर करणेही शक्य होणार आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार (कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
विद्यापीठाच्या आवारात अनेक इमारती आहेत. त्यात दैनंदिन वापरातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होते. ते महापालिकेच्या गटारांमध्ये न सोडता या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प असेल. तो एक वर्षात (३१ ऑक्टोबर २०२० पूर्वी) पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकियेसाठी एम.बी.बी.आर. (Moving Bed Biofilm Reactor) हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १.८८ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. आर. व्ही. पाटील यांनी दिली.
या प्रकल्पातून निर्माण होणारे पाणी एका मोठ्या टाकीत साठवले जाणार आहे. ते विद्यापीठातील बागांसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे भूजलाचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी करता येणार आहे. यातून पाण्याची बचत होईलच, शिवाय विद्यापीठातील हिरवाईसुद्धा कायम राहणार आहे. इतके पाणी उपलब्ध होणार असल्याने ती अधिक चांगली करता येणार आहे. हा प्रकल्प चांगल्याप्रकारे चालावा तसेच, त्याची देखभाल-दुरुस्ती होत राहावी म्हणून पाच वर्षासाठी एक एजन्सी नेमण्यात येणार आहे. ती या सर्व गोष्टींची काळजी घेईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पाचे फायदे :-
- दररोज तब्बल १२ लाख लिटरपर्यंत सांडपाणी शुद्ध करता येणार.
- महापालिकेच्या गटारांच्या व्यवस्थेवर विद्यापीठातील सांडपाण्याचा पडणारा ताण कमी होणार.
- विद्यापीठातील बागा आणि झाडांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार.
- भूजलातील पाणी वापरण्याची गरज उरणार नाही. याउलट बागांना पाणी दिल्यामुळे भूजलाचे पुनर्भरण होण्यास मदत होणार.
- विद्यापीठाचा परिसर पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने मदत होणार.