मुंबई : कोरोनाचे संकट अचानक नाहीसे होणारे नसून आपल्याला त्यासोबत जगायला शिकावे लागणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून पुढे कदाचित यापेक्षा कठीण परिस्थिती येईल. ही महामारी थांबवायची असेल तर प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. या संदर्भात विद्यापीठांनी तसेच विद्यार्थ्यांनी समाजात व्यापक जनजागृती केली आणि पुरेशी खबरदारी घेतली, तर कोरोनाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देता येईल. या कठीण प्रसंगी समाजातील गरजू आणि उपेक्षित लोकांसाठी काम केले तरच विद्यापीठातील दीक्षा सार्थकी ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी(दि. 3 मे) केले.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 29 वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षण म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नसून शिक्षण हे मनुष्यामध्ये अगोदरच असलेले पूर्णत्व प्रकट करण्याचे साधन असल्याचे सांगून प्रत्येकाने आपल्यातील सद्गुणांचा विकास करून चांगले मनुष्य झाले पाहिजे, असे राज्यपालांनी आपल्या दीक्षांत भाषणात सांगितले.
बहिणाबाई चौधरी स्वतः फारश्या शिकलेल्या नसून देखील त्यांनी सांगितलेले जीवनाचे सार अलौकिक असल्याचे सांगताना राज्यपालांनी बहिणाबाई यांची ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेंव्हा मिळते भाकर’ ही ओवी उधृत केली. विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही होऊन नवनवीन संशोधन केले पाहिजे, तसेच शिक्षकांनी पारखी होऊन विद्यार्थी घडविले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी स्नातकांना सत्य बोलण्याचा, सत्याचरण करण्याचा तसेच आपल्या आचार विचारातून कोणासही मानसिक वा कायिक दुःख होणार नाहे याची दक्षता घेण्याचा सल्ला दिला.