उत्तरपत्रिकेचे विकेंद्रीकरणाची अंमलबजावणी सुरू : परीक्षा विभागाने निर्माण केली सक्षम व्यवस्था
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निकाल वेळेत लागण्यासाठी नगर, नाशिक आणि पुणे येथील केंद्रांवर परीक्षा झाल्यानंतर त्याच जिल्ह्यात उत्तरपत्रिकेचे विकेंद्रीकरण करीत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचबरोबर यावर्षी परीक्षेच्या केंद्रीय मूल्यमापन केंद्र (कॅप) ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीसाठी ऐनवेळी परीक्षक गैरहजर असल्यास, तातडीने परीक्षक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परीक्षा विभागाने सक्षम व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे परीक्षांचा निकाल 30 दिवसांत लागण्याची चिन्हे आहेत.
विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्यापीठांना एखाद्या अभ्यासक्रमांची परीक्षा झाल्यानंतर किमान 30 दिवसांत निकाल जाहीर करणे आवश्यक आहे. तर, कमाल 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. मात्र, या कालावधीनंतर निकालास दिरंगाई झाल्यास, त्याबाबतचा खुलासा राज्यपाल अर्थात कुलपतींकडे द्यावा लागतो. त्यातच कारणांसह विद्यापीठांना माहिती सादर करावे लागते. ही वेळ येऊ नये, यासाठी यापूर्वीच पाऊल उचलले आहे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मागच्या वर्षी निकाल वेळेत लागण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने बैठका घेतली आणि त्यानुसार शिफारसी मांडल्या. त्यात परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन महिने आधीच उत्तरपत्रिका तपासणी अर्थात केंद्रीय मूल्यमापन केंद्र (कॅप) ठिकाण निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानंतर नगर, नाशिक आणि पुणे येथील केंद्रांवर परीक्षा झाल्यानंतर त्याच जिल्ह्यात उत्तरपत्रिकेचे विकेंद्रीकरण केल्यास वेळेचा मोठा अपव्यय टळेल, असा प्रस्ताव मांडला. त्यांनतर विद्यापीठाने मागच्या वर्षापासून विकेंद्रीकरणाची पद्धत लागू केली होती.
परीक्षक देणे शक्य होणार
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एखाद्या कॅप सेंटर ठिकाणी परीक्षक गैरहजर राहिल्यास, त्या ठिकाणी तातडीने नवे परीक्षक देता येण्याची व्यवस्था केली आहे. परीक्षकांचा डाटा विद्यापीठाकडे आहे. संबंधित कॅप सेंटरने परीक्षा विभागाला गैरहजर प्राध्यापकाची माहिती दिल्यास त्यानुसार वेळेत नव्याने परीक्षक तात्काळ देणे शक्य होणार आहे.
सध्या विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राचे परीक्षा सुरू आहेत, तर काही संपत आहेत. यंदा मात्र परीक्षक ऐनवेळी उपस्थित नसल्यास, तातडीने कॅप सेंटर ठिकाणी नवे परीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
– डॉ. अरविंद शाळीग्राम