भुवनेश्वर – विद्यापीठे ही कल्पनांची उत्तम केंद्र आहेत, परंतु ती वास्तविक जगाच्या तथ्यापासून वेगळी नाहीत- ती समाजाचा भाग आहे आणि अशा प्रकारे ती सामाजिक परिवर्तनाशी जोडलेली राहतील असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. शैक्षणिक समुदायाने अशा क्षेत्रात संशोधन करायला हवे ज्यामुळे केवळ ज्ञानाचा नवीन आधार तयार होणार नाही तर मानवी समाजाला टिकवून ठेवणारा ज्ञानाचा आधार देखील तयार होईल. भुवनेश्वर येथील उत्कल विद्यापीठाला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सांगता समारंभात ते आज बोलत होते.
वंचितांच्या सबलीकरणाच्या संकल्पनांप्रति विद्यार्थी आणि शिक्षकांनी संवेदनशील असले पाहिजे. पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण योग्य प्रकारे घेतले पाहिजे. उत्कलसारखी विद्यापीठे जी बहु- विद्याशाख्यांनी संपन्न आहेत, ती हे कार्य करायला अधिक सुसज्ज आहेत असे राष्ट्रपती म्हणाले.
सत्तर वर्षांचा काळ हा मैलाचा दगड असतो. या प्रदीर्घ प्रवासादरम्यान, जेव्हा आपण पैलतीरी पोचतो तेव्हा आपण थांबतो; मग आपण मागे वळून पाहतो आणि पुढे जातो असे राष्ट्रपती म्हणाले. साध्य यशाची तसेच अशी क्षेत्रे जिथे आणखी सुधारणा शक्य आहेत अशा गोष्टींचा आढावा घेण्याची ही वेळ आहे. संपूर्ण उत्कल समुदायासाठी, संस्थापकांच्या स्वप्नांप्रति नव्याने समर्पित होण्याची वेळ आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय व जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास विद्यापीठ कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी ओदिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील बारुई टेकडीला भेट दिली आणि पायका विद्रोह यांच्या स्मारकाची पायाभरणी केली.
पूर्वजांच्या बलिदानाबद्दल तरुणांना जागरुक करावे…
आपल्या इतिहासाच्या गौरवशाली अध्यायांविषयी लोकांना परिचित करणे, विशेषत: आपल्या पूर्वजांच्या बलिदानाबद्दल तरुण पिढीला जागरूक करणे,हा राष्ट्र-उभारणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पायका विद्रोह स्मारक बांधण्यात केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. हे स्मारक पायका विद्रोह संबंधित अभ्यागतांना, विशेषत: तरुणांना महत्त्वाची माहिती देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.