कोलकता -दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी पश्चिम बंगालमधील वातावरण ढवळून काढले. त्या मोर्चाचे नेते राकेश टिकैत कोलकता आणि नंदीग्राममधील शेतकरी महापंचायतींना उपस्थित राहिले. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपचा उल्लेख लबाडी करणाऱ्यांचा पक्ष म्हणून केला.
बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शेतकरी महापंचायती झाल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात महापंचायत घेऊन टिकैत यांनी भाजपविरोधी संदेश दिला. भाजपला मतदान करू नका. तो पक्ष सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी बड्या उद्योगांना देईल. संपूर्ण देशच तो पक्ष उद्योगपतींच्या हाती सोपवेल. कुठल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मी बंगालमध्ये आलो नाही. भाजपविरोधी लढ्यासाठी आलो आहे. भाजपला विरोध करणाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी असणाऱ्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू, असे ते म्हणाले. त्याआधी कोलकता विमानतळावर दाखल झालेल्या टिकैत यांच्या स्वागतासाठी ममता यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते.