पुणे – मनुष्य जन्मत: गुन्हेगार नसतो. पण क्षणिक रागावर ताबा न मिळवता आल्याने अनर्थ होतो. अन् आयुष्य अंध:कारमय होण्याची भीती असते. अशाच रागाच्या भरात घडलेल्या गुन्ह्यात झालेली शिक्षा भोगून झाल्यानंतर जगण्याचे साधन निवडण्याचे मोठे आव्हान असते. अशाच एका बंदिजनाला स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कार्य भोई प्रतिष्ठान, आदर्श मित्र मंडळ आणि कारागृह प्रशासन यांनी प्रेरणापथ उपक्रमात केले. त्याच्या कटिंग सलूनचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले.
नाभिकाचे कार्य तसे अवघडच. चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करताना ते करून घेणाऱ्यालाही इजा होऊ नये याचे भान ठेवावे लागते. तसेच आपल्या चुकीचे प्रायश्चित्त घेऊन समाज प्रवाहात परतणाऱ्याला सन्मानजनक जगता येण्यासाठी साथी हात बढाना म्हणणे हे समाजहिताच्या व्यापक दृष्टीने किती आवश्यक असते याचाच प्रत्यय या कार्यक्रमात आला.
या समाजभान जोपासणाऱ्या कार्यक्रमासाठी पोलीस माहनिरीक्षक (कारागृह) अतुलचंद्र कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतूक तर केलेच. शिवाय हे सलून सुरू करणाऱ्या युवकाला प्रोत्साहन मिळावे म्हणून धीराच्या चार गोष्टींचा सल्लाही दिला. कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप परदेशी आदी यानिमित्त उपस्थित होते.
कारागृह सुधारणेचे काम सुरू
कारागृह सुधारणेसाठी नवीन प्रकल्प शोधण्याचे काम सुरू आहे. यासाठी शासनाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक सहकारी बॅंक विनातारण कर्ज देण्यासाठी पुढे आली आहे. सुधारसेवेचे काम आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी हा आदर्श राष्ट्रीयकृत बॅंकांनी घ्यावा, अशी अपेक्षा अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
या संदर्भात एक प्रस्ताव तयार असून तो शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजचा कार्यक्रम हा सुधारसेवेचे महत्त्वाचे पाऊल आहे हे मानतो. व्यक्ती कारागृहात गेला तर त्याच्यावर शिक्का मारला जातो. कैद्यांना समाज, नातेवाईक स्वीकारत नाहीत. यासाठी समाजाने बदलण्याची गरज आहे.