पुणे – करोनाचा वाढता धोका लक्षात घेता महापालिकेकडून शहरातील पालिकेच्या सर्व भाजी मंडई बंद केल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे.
शहरात राज्य शासनाने संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. त्यात भाजी, किराणा माल, औषधे तसेच इतर अत्यावश्यक साहित्यांचा समावेश आहे. तरीही नागरिकांनी मंडईमध्ये गर्दी केली होती. त्यातच, पोलीस असूनही ही अत्यावश्यक बाब असल्याने ही गर्दी आटोक्यात येण्यास तयार नव्हती. त्यामुळे प्रशासनाने मंडईत ठराविक अंतर सोडून पांढऱ्या पट्या मारल्या असून नागरिकांना उभे राहण्यास सांगितले आहे. तसेच एका स्टॉलसमोर एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक थांबणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच भाजीविक्रेत्यांना मास्क बंधनकारक केले आहे.