श्रीनगर – सध्या जगभरासह भारतामध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. देशामध्ये सध्या दरदिवसाला ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडतायेत. या परिस्थितीला अटकाव करायचा असल्यास मास्कचा वापर हा सध्यातरी सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र अद्याप देखील आपल्या आजूबाजूचे काही महाभाग मास्कचा वापर करण्यास टाळाटाळ करताना दिसतायेत.
अशातच कोरोना विषाणू संकटाच्या काळामध्ये स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी मास्क वापरायलाच हवा हा बहुमूल्य संदेश देण्यासाठी जम्मू-काश्मीरातील एका प्रादेशिक वृत्तपत्राने वेगळाच मार्ग अवलंबलाय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जम्मू-काश्मीर येथील श्रीनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘रोशनी’ या उर्दू भाषेतील प्रादेशिक वृत्तपत्राने आपल्या अंकासोबत चक्क खराखुरा मास्क पाठवलाय. यासोबतच, ‘मास्कचा वापर गरजेचा आहे. यामुळे तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकता’ असा संदेशही देण्यात आलाय.
या मास्कसोबतच वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जम्मू-काश्मीरातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येचा आलेख देखील देण्यात आलाय. याबाबत बोलताना ‘रोशनी’च्या संपादकांनी, “आम्हाला असं वाटलं की लोकांना मास्कच्या वापराचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. लोकांना थेट मास्क देऊन मास्कचे महत्व सांगितले तर त्यांना ते पटेल असा विचार आम्ही केला. यासाठी आम्हाला काही लोकांना नव्याने कामावर घ्यावं लागलं. सगळं वेळेवर पार पडावं यासाठी मास्क देणार असलेल्या दिवसाची डमी कॉपी आम्हाला नियोजित वेळेच्या तीन तास आधीच छापावी लागली होती.” अशी माहिती दिली.
दरम्यान, जगभरातील अनेक तज्ज्ञांनी कोरोना विषाणूच्या प्रसारास अटकाव करायचा असल्यास मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे असल्याचं सांगितलंय. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केल्यास आपण आपल्याला व इतरांना कोरोना बाधेपासून वाचवू शकतो असं देखील सांगण्यात येतंय. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही नागरिक हलगर्जीपणा दाखवत असून यामुळे प्रशासनाला मास्कचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई करावी लागतीये.