मुंबई – ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी फरार केपी गोसावीचा बॉडीगार्ड आणि पंच प्रभाकर साईलने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आपल्याला कोऱ्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या करायला लावल्याचेही साईलने सांगितलं. त्यामुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित तसेच खोडसाळ आहेत. नवाब मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका चुकीची आहे. समीर वानखेडे यांचे चारित्र्यहनन करण्याचे काम नवाब मलिक यांनी थांबावावे, असंही आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच वानखेडेंना राज्य सरकारने संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
याआधीही आठवले यांनी समीर वानखेडे प्रकरणावर आपलं मत व्यक्त केल होतं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाते की नवाब मलिकाचे मंत्रिपद जाते ते बघू या, असा सूचक इशारा आठवले यांनी दिला होता. वानखेडेंची नोकरी घालवणार असा इशारा नवाब मलिका यांना काही दिवसांपूर्वीच दिला होता.