नवी दिल्ली -लोकसभेतील गदारोळानंतर कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा स्वीकारत केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. वर्धन यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात असंसदीय वक्तव्य केल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून राहुल यांच्यावर वर्धन यांनी लोकसभेत निशाणा साधला. त्यावरून कॉंग्रेस आणि भाजपचे सदस्य आमनेसामने आल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यानंतर राहुल आणि कॉंग्रेसच्या काही खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. अनावश्यक वक्तव्य करणाऱ्या वर्धन यांच्या कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेस खासदारांनी त्या भेटीत केली. सरकारला प्रश्न विचारण्यापासून राहुल यांना रोखण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. नंतर ट्विटरवरून राहुल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. बेरोजगारीच्या पेचावर तोडगा कसा काढायचा याची कुठलीच कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही. त्यांना प्रश्न विचारले जाऊ नये यासाठी चर्चा रोखण्याच्या उद्देशातून भाजपकडून संसदेच्या कामकाजात अडथळे आणले जातील, असा आरोप राहुल यांनी केला.
दरम्यान, मोदी यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल राहुल यांनीच माफी मागावी. राहुल यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी त्यांनी माफी मागावी अशी विनंती त्यांना करणे माझ्यासाठी अगत्याचे होते, असे वर्धन यांनी म्हटले. त्यामुळे माफी मागण्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.