कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी त्या तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांची मदत घेत आहेत. तसेच हिंसाचारातील आरोपींचा रोहिंग्यांशी संबंध असून ते ममतांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ममतांच्या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील वाद वाढत आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपाच्या व तृणमूलच्या अनेक कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.