दिल्ली – महामार्गावरील टोल हा सर्वसामान्यांच्या जीवनातला एक भाग बनला आहे. याच टोलबाबत केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एक मोठी घोषणा केली. शहरातील टोल आता माफ करणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. नितीन गडकरी यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचा मोठा फायदा होणार आहे.
नितीन गडकरी राज्यसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तरे देत होते. यावेळी त्यांनी ‘टोलचा फादर ऑफ टोल टॅक्स’ मीच आहे असं म्हणत महाराष्ट्रातील ठाणे भिवंडी हा पहिला टोल प्रकल्प आणल्याची आठवण देखील करून दिली. आता आम्ही नवीन प्रकल्प सुरु करत आहोत ज्यामध्ये, टोलमधून शहरी भाग वगळला जाईल आणि त्यांच्याकडून टोल घेतला जाणार नाही अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
शहरातील लोकांकडून कोणताही अधिभार घेतला जाणार नाही. कारण १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी त्यांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो असंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. राज्यसभेतील सदस्यांनी टोल प्लाझाबाबत चिंता व्यक्ती केली होती. त्यावर नितीन गडकरी यांनी सभागृहात पुरवणी प्रश्नांमध्ये सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.