पुणे – सध्याचे राजकारण पराकोटीला गेले आहे. देशातील काही राज्यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते एकमेकांना बोलत नाही. मात्र महाराष्ट्रात तसे नाही. आपल्या महाराष्ट्रात राज्यात निवडणूक असेल तेव्हा राजकारण असते. निवडणूक झाल्यावर सगळे एक असतात, हीच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा देशाच्या राजकारणात अनुकरण करण्यासारखे असून, ती पुढे नेण्याची गरज आहे, अशा शब्दात केंद्रीय दळणवळमंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य मांडले.
ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे लिखित “जुनी नवी पानं’ आणि “कासा 20′ या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख, खासदार गिरीश बापट, शां. ब. मुजुमदार, डॉ. पी. डी. पाटील, नागराज मंजुळे, गिरीश गांधी आदी उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असूनही देशातील सगळ्या पक्षातले लोक मला जवळचे आहेत. नुकतेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दीड तास गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांना विचारला माझ्यावर तुमचा किती विश्वास आहे. त्यावर त्यांनी 110 टक्के तुमच्यावर विश्वास असल्याचे सांगितले. थोडक्यात सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. ही राजकारणात महत्त्वाची बाब आहे. तामिळनाडूत दोन्ही पक्ष एकमेकांना भेटत नाहीत अथवा बोलत नाही. परंतु महाराष्ट्रात तशी स्थिती नाही, असे सांगत गडकरी यांनी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरचे महत्त्व सांगितले.