नवी दिल्ली – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याची मूभा देण्यात आली होती. दरम्यान करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, सोमवारपासून केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीसह काम केले जाईल. रविवारी करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि करोनाची घटती प्रकरणे आणि संसर्गाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन कार्यालयांमध्ये सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांची पूर्ण उपस्थिती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने 3 जानेवारीपासून केंद्रिय कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीचा नियम लागू केला होता. त्यानंतर 31 जानेवारीला निर्देश देऊन हा नियम 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला. मात्र आता आठवडाभरापूर्वी हा आदेश मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जाणे बंधनकारक असणार आहे.