केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली माहिती
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. त्यामुळे सध्यातरी तेथून सुरक्षा दलास हटवण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान तेथील नागिरकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असताना तेथील सैन्य का माघारी बोलावू ? असेही रेड्डी यावेळी म्हणाले.
रेड्डी म्हणाले की, पाकिस्तान येथील परिस्थिती अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तो आंतरराष्ट्रीय समुदायाकडे येथील परिस्थितीबद्दल तक्रार करण्यासाठी पुन्हा जाऊ शकेल. अतिरिक्त जवानांना परत बोलावायचे की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडूनच घेतला जाईल. सरकार पाकिस्तानच्या कुरापती पाहता सावधतेचा पवित्रा घेत आहे.
विरोधकांनी देखील हो गोष्ट लक्षात घेऊन संयम बाळगायला हवा. पाकिस्तानची इच्छा आहे की जम्मू-काश्मीरमधील वातावरण अशांत व्हावे, जेणेकरून जगासमोर त्याला भारताने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मांडता येईल. मात्र, आम्ही तेथील परिस्थितीची सातत्याने माहिती घेत असून शांतता प्रस्थापित करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.