नवी दिल्ली : करोनाने देशातल्या कॅम्पेनचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. कारण बिहार नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपाच्या कॅम्पेनची सुरूवात करणार आहेत. शाह यांची ही व्हर्च्युअल रॅली महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. परंतु भाजपा यासाठी आतापासूनच तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमित शाह निरनिराळ्या मीडिया प्लॅ़टफॉर्मवर ११ वाजता भाजपा कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला संबोधित करणार आहेत. ही रॅली राज्यातील राजकीय स्थिती बदलून टाकणार असल्याचे मत पश्चिम बंगालचे भाजपा प्रमुख दिलिप घोष यांनी व्यक्त केले. आगामी विधासभा निवडणुकीच्या दृष्टीने ही आमच्यासाठी महत्त्वाची रॅली आहे आणि अधिकाधिक लोकांना यात सामिल करून आम्ही जागतिक विक्रम करण्याची तयारी करत असल्याचे ते म्हणाले.
बिहारमध्येदेखील भाजपाने अमित शाह यांची व्हर्च्युअल रॅली यशस्वी केली होती. रॅलीसाठी ७२ हजार बूथवर ७२ हजार एलईडी स्क्रिनही लावण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारची तयारी करण्यात येत आहे. “ही रॅली आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण ३ ते ४ महिन्यांनंतर कोणती राजकीय बैठक यानिमित्ताने होत आहे. आम्ही याद्वारे अधिक लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत असून जागतिक विक्रम करण्याचाही प्रयत्न करणार आहोत,” असे घोष म्हणाले.
राज्यात एकूण ८० हजार बूथ आहेत आणि ६५ हजार बूथवर आमची बूथ समिती आहे. प्रत्येक बूथ समितीमध्ये कमीतकमी ५ आणि सरासरी १० ते १५ सदस्य आहेत. याप्रकारे ५ लाखांपेक्षा अधिक लोक सहपरिवार या व्हर्च्युअल रॅलित सहभागी होतील. याव्यतिरिक्त २५ जार व्हॉट्सअॅप ग्रुपही आहेत, ज्याद्वारे संदेश पोहोचवला जात आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट नाही किंवा स्मार्टफोन नाही त्यांना एक नंबर देण्यात आला आहे. त्याद्वारे त्यांना ही रॅली ऐकता येणार असल्याचे घोष म्हणाले.