नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचरानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक आमंत्रित केली आहे. या बैठकीस राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री उफाळलेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी ही बैठक घेण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वी हिंसाचारग्रस्त भागातील आमदारांची बैठक मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली. दिल्लीतील काही भागात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपणास चिंता वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. उत्तर पूर्व दिल्लीत निदर्शकांनी घरे, पेट्रोलपंप पेटवले. दगडफेक केली. वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या हिंसाचारात चार जण ठार झाले आहेत. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. निमलष्करी दलातील जवानांसह अनेक पोलिस जखमी झाले आहेत.