मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील गावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. ज्यांनी पीक विमा काढला त्यांना आणि ज्यांनी काढला नाही त्यांनाही मदत मिळेल, अशी तरतूद केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याबाबत सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिथे सरकारी मदत पोहचू शकत नाही, तिथेही मदत दिली जाईल तसेच 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. यावेळचे नुकसान हे नेहमीच्या नुकसानीपेक्षा अधिकचे आहे. मुख्य सचिव, वित्त सचिव यांना सक्रिय करण्यात आले असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
सरकारच्या वतीने आतापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली जाईल असे मी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वस्त करु इच्छितो. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना आता योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.