सातारा : रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्या दुचाकीस्वरांवर लाठीहल्ला न करता त्यांच्या दुचाकी आता 14 दिवसांसाठी जप्त करण्यात येत असून जिल्ह्यात गत चार दिवसात तब्बल 667 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. या दुचाकी पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गेल्या वीस दिवसांपासून जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त राबवला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून वारंवार सूचनाही दिल्या जात आहेत. गेल्या आठवड्यामध्ये माण तालुक्यातील एका सैन्य दलातील जवान आणि साताऱ्यातील एका व्यक्तीवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. त्यामुळे सोशल मीडियावरून पोलिसांविषयी संतप्त भावना व्यक्त होत होत्या.
पोलीस अधीक्षक तेजीची सातपुते यांनी पोलिसांना भावनिक आव्हान करत लाठीहल्ला करू नका, समजून सांगा, फार तर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीहल्ला न करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर काही पोलिसांच्या हातात आता काठी दिसत नाही. यावर पर्याय म्हणून पोलिसांनी दुचाकी 14 दिवसांसाठी जप्त करण्याचा निर्णय घेतला. लाठीहल्ला होत नसल्याचे पाहून अनेक जण याचा गैरफायदा घेऊ लागले. काहीही काम नसताना केवळ कंटाळा आला म्हणून युवक फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर येऊ लागले आहेत. परिणामी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुचाकी जप्त करण्याचा सपाटा लावला आहे.
विशेषता सातारा, कोरेगाव, महाबळेश्वर, कराड, पाटण, उंब्रज, शिरवळ, फलटण, वाई, दहिवडी याठिकाणी अशा प्रकारच्या कारवाई होताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात केवळ चार दिवसात 667 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. जेणेकरून युवकांनी कायद्याचे पालन करावे, या हेतूने पोलिसांनी त्यांच्या दुचाकी जप्त केले आहेत. सकाळी सात ते दुपारी एक आणि संध्याकाळी 5 ते ते रात्री नऊ या कालावधीमध्ये पोलीस कारवाई करत आहेत.
विशेषता सायंकाळी पाच ते सहा या वेळेत बाहेर पडणाऱ्या युवकांचे प्रमाण जास्त आहे,असे युवकच पोलिसांच्या सापळ्यात अडकत आहेत. कारवाई केल्यानंतर दुचाकी क्रेनच्या सहाय्याने पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहेत. ही कारवाई करताना एका ठिकाणी दहा ते बारा पोलिस उभे राहत असल्यामुळे दुचाकीस्वार पोलिसांशी हुज्जत घालत नाहीत.