रणजित देशमुख, नंदकुमार मोरेंचा खांद्याला खांदा; आमदार गटालाही खिंडार
वडूज – माण-खटाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना निवडून आणण्यासाठी निमसोड, ता. खटाव येथील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, काकासाहेब मोरे यांनी आता एकत्र येत वज्रमूठ आवळली आहे.एकमेकांना पाण्यात पाहणारी ही नेतेमंडळी निमसोड येथील प्रभाकर देशमुख यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने प्रथमच एका व्यासपीठावर आली होती. माजी उपसरपंच व बाजार समितीचे संचालक काकासाहेब मोरे यांनी शेवटच्या क्षणी देशमुख यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याने गावात माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाला खिंडार पडले आहे.
निमसोड येथील देशमुख व मोरे यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे. मात्र, खटाव-माण तालुक्यातील दहशत व गुंडगिरीचे राजकारण संपविण्यासाठी, तालुक्याचा कायापालट घडविण्यासाठी ही प्रमुख राजकीय मंडळी व त्यांचे हजारो कार्यकर्ते आपापसातील हेवेदावे बाजूला सारून एकत्र आले आहेत. त्यांना माजी आमदार कै. शिवाजीराव पवार यांच्या समर्थकांची साथ लाभत आहे.
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, प्रा. अर्जुन खाडे, अशोक गोडसे, प्रा. बंडा गोडसे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, सुरेश शिंदे, शिवाजीराव सर्वगौड, संदीप मांडवे, हिंदुराव गोडसे, नंदकुमार गोडसे, नाना पुजारी, बाळासाहेब माने, बबनराव वीरकर, डॉ. प्रकाश पाटोळे, श्रीकांत देवकर हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
माजी आमदार गोरे यांना रोखण्यासाठी खटाव-माण तालुक्यांमध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांमधून उठाव होत आहे. रणजित देशमुख, नंदकुमार मोरे व काकासाहेब मोरे यांनी देशमुख यांना साथ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशमुख म्हणाले, समाजात चुकीच्या प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी सर्वसामान्य लोकांनीच ही निवडणूक हाती घेतली आहे. प्रस्थापितांविरोधात गावोगावी उठाव होत असल्याने आपला विजय निश्चित आहे.
डॉ. येळगावकर म्हणाले, पायाखालची वाळू सरकल्याने आमदार गोरे बेताल वक्तव्ये करत आहेत. जिल्ह्यात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आल्यास त्यांना पक्षाने मंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहेत. प्रभाकर घार्गे म्हणाले, खटाव-माण तालुक्यांमधील गुंडगिरी हद्दपार करण्यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते एकत्र आले आहेत. जनतेनेही त्यांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे विरोधकांचा पराभव अटळ आहे. अनिल देसाई, डॉ. देशमुख, नंदकुमार मोरे, रणजितसिंह देशमुख, यांची भाषणे झाली. सुभाषराव शितोळे यांनी आभार मानले.