ढाका – बांगलादेशात प्रवासी बोटीला आग लागून तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट 3 मजली होती आणि त्यामध्ये 800 प्रवासी दाटीवाटीने प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये 150 जण जखमी झाले आहेत. बांगलादेशाच्या दक्षिणेकडील सौगंधा नदीमध्ये ही दुर्घटना घडली. हे ठिकाण राजधानी ढाकापासून 250 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडील झालाकथी जिल्ह्यात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एमव्ही अभिजन-10 ही प्रवासी बोट राजधानी ढाक्यातून बारगुना येथे जात होती. स्थानिक प्रमाणवेळेनुसार बोटीच्या इंजिनरूममध्ये ही आग आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लागली, असे पोलीस आणि अग्निशामक दलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेनंतर बोटीतील इतर प्रवासी बेपत्ता झाले असल्याचेही पोलिसांनी सांगितले. बोटीला लागलेल्या आगीमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, असे बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र खासगी वृत्तवाहिन्यानी दिलेल्या वृत्तानुसार 41 जणांचा मृत्यू झाला.
मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू असून, मृतांबाबतची ताजी माहिती नंतर कळवण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. या बोटीमधून 310 प्रवासी प्रवास करत होते, अशी नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांची संख्या खूपच जास्त असण्याची शक्यता आहे, असे जहाज मंत्रालयाचे उपमंत्री खलिद महमूद चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सात सदस्यीय समिती स्थापन करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे काम देण्यात आले आहे. जखमींचा आकडा खूप जास्त असल्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.
सध्या शेजारच्या बरिशाल जिल्ह्यातल्या रुग्णालयात 70 जणांवर उपचार सुरू आहेत, तर अन्य ठिकाणच्या रुग्णालयात आणखीन 50 जणांवर उपचार सुरू आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागली तेव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अनेक प्रवासी भाजल्यामुळे आणि धुरामुळे श्वास कोंडल्यामुळे मृत्यू पावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोस्टगार्ड, अग्निशामक दल आणि पोलिसांची पथके कार्यरत आहेत.