बेल्हे : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील ३ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली असून या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेत साहिल रंगनाथ घोडे (14), मयूर रामदास घोडे (10) आणि आनंद विजय खाडे ( 11) या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती, रविवार दि.१३ रोजी दुपारच्या सुमारास शाळेला सुट्टी असल्याने निमगाव सावा येथील ओढ्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी तिघेही सायकलवरून गेले होते. सायंकाळी उशीरापर्यंत घरी न आल्यामुळे शोधाशोध करण्यात आली.
बंधाऱ्याच्या कडेला तिघांचे कपडे व चपला दिसल्यानंतर ते ओढ्यात पोहण्यासाठी गेले असावेत असा संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान, स्थानिक लोकांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता त्यांना पाण्यातून बाहेर काढले.
तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ही दुर्दैवी व अत्यंत वाईट घटना घडली असून असा प्रसंग कोणाच्याही नशिबात येऊ नये असे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी सांगितले. या घटनेने तिन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.