कोरेगाव – येथील बाजार समितीच्या पुढे असणाऱ्या अनन्या रेसिडेन्सीतील एकाच फ्लॅटमध्ये एका युवकाचा जळून तर दुसऱ्या युवकाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. ऋषिकेश राजेंद्र ताटे (वय 30), सुभाषकुमार सूरजप्रसाद उर्फ अंशू (वय 20) अशी मृत पावलेल्याची नावे आहेत. कोरेगाव पोलीस ठाण्यात या घटनेबाबत आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बाजार समितीपुढे अनन्या रेसिडेन्सीमध्ये तिसऱ्या मजल्यावर रोहन राजेंद्र ताटे, त्यांची आई संगीता ताटे, भाऊ ऋषिकेश ताटे, सागर ताटे, आत्या मीना जगनाथ ताटे भाड्याने फ्लॅट घेऊन राहतात. रोहन ताटे यांचे वाठार स्टेशन येथे हॉटेल व्यवसाय आहे. त्यांच्याकडे कामाला असणारा सुभाषकुमार सूरजप्रसाद (मूळ रा. बदलेपूर सिनापूर, तहसील घाटमपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. जळगाव रोड, आझाद चौक) हा देखील अधूनमधून यांच्याकडे राहण्यासाठी येत होता. रविवार दि. 19 मार्च रोजी ताटे कुटुंबीय गावच्या यात्रेनिमित्त आपल्या मूळ गावी बोधेवाडीला (ता. कोरेगाव) येथे गेले होते. यावेळी त्यांच्यासमवेत सुभाषकुमार हादेखील गेला होता. रात्री उशिरा जेवण करून ताटे यांचा मोठा मुलगा ऋषिकेश आणि सुभाषकुमार परत कोरेगावला अनन्या रेसिडेन्सीमधील रूमवर झोपण्यासाठी आले. दरम्यान, मध्यरात्री 12 ते 2 च्या दरम्यान ताटे यांच्या फ्लॅटमधून आगीच्या ज्वाला येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या लोकांना दिसले. फ्लॅटमध्ये कोंडून राहिलेल्या आगीमुळे फ्लॅटच्या काचा शेजारील रानात फुटून पडल्या.
काचेचा आवाज आणि आगीचे लोट पाहूनशेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझल्यानंतर फ्लॅटचा दरवाजा तोडून शेजारील लोक आतमध्ये गेले. त्यावेळी हॉलमध्ये सुभाषकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर आत बेडमध्ये ऋषिकेश जळून खाक होऊन पडला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार तात्काळ सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी आले. सकाळी ऋषिकेश आणि सुभाषकुमार यांचे शव विच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. याबाबत रोहन ताटे याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार तपास करत आहेत. दरम्यान, फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. आतील बेड रुममध्ये ऋषिकेश जळून पडला होता. आणि बाहेरच्या हॉलमध्ये सुभाषकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. त्याच्या हातातोंडाला आगीच्या झळा लागल्या होत्या. त्यामुळे ऋषिकेश कसा पेटला की त्याने स्वतः पेटवून घेतले का, आणखी काय प्रकार आहे. त्याने पेटवून घेतले असेल तर सुभाषकुमारने त्याला विझवण्याचा प्रयन्त केला का, केला असेल तर त्याचे हात पाय भाजलेले असताना त्याला गळफास कसा लागला असेल असे अनेक प्रश्न शहरात उपस्थित केले जात होते. याबाबत सखाराम बिराजदार म्हणाले, “”फ्लॅटला आतून कडी होती. त्यामुळे बाहेरून घातपात घडण्याचा प्रश्न नाही. जे काही घडले असेल ते आतच घडले असेल. आज तरी कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. उद्यापर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील.'”
ऋषिकेशच्या लग्नापूर्वीच दुर्दैवी प्रकार
ऋषिकेश येथील श्री क्लिनिकमधील मेडिकलमध्ये गेल्या तीन चार वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. मितभाषी आणि संयमी अशी त्याची ओळख होती. वडिलांचे छत्र हरपल्याने मोठा या नात्याने तो काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या पाठीमागे दोन लहान भाऊ, आई असा परिवार आहे. दरम्यान, ऋषिकेश याचे लवकरच लग्न होणार होते. त्यापूर्वीच हा दुर्दैवी प्रकार घडल्याने मित्रांनी हळहळ व्यक्त केली.