पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची ग्वाही
सातारा – सातारा जिल्ह्याचा आराखडा 264 कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. मात्र, मागील वर्षाचा अखर्चित निधी सर्व विभागांना तातडीने वितरित करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या येत्या 27 जानेवारी रोजी जिल्हयासाठी होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी जिल्हाधिकाऱ्यांच्या संवाद कक्षात संवाद साधला. पालकमंत्री म्हणाले, “”आचारसंहिता इतर तांत्रिक कारणाने सातारा जिल्हा परिषदेकडे अखर्चित निधी दिसतो आहे.
मात्र, गिरीस्थान पर्यटन, नगरोत्थान व दलितेतर वस्ती सुधार योजनांसाठी अखर्चित निधी दिला जाईल. त्याचे नियोजन करण्यात आले असून त्याची स्वतंत्र यादी सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिल्याचे पाटील यांनी सांगितले. सातारा जिल्हा प्रशासनात काही विभागप्रमुखांच्या जागा रिक्त असल्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.
रिक्त जागांसाठी सामान्य प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन बाळासाहेब पाटील यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवरायांशी व नरवीर तानाजी मालुसरे यांची तुलना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी केली जाते, या प्रश्नावर ना. पाटील म्हणाले, “युगपुरूषांची तुलना राजकीय अर्थाने होऊ नये. अशी तुलना अजिबात होऊ नये, हे योग्य नाही.’
पालकमंत्र्यांची दिव्यांगांसाठी तत्परता
राज्याचे सहकार मंत्री व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वजनदार मंत्री म्हणून परिचित बनले आहेत. अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी त्यांच्यापासून साधेपणा शिकत असतात. काल मुक-बधीर विद्यार्थ्यांना चिठ्ठी काढण्यासाठी फार वेळ ताटकळत ठेवू नये, यासाठी पालकमंत्र्यांनी चक्क पत्रकार परिषद पुढे ढकलली व मूक-बधीर विद्यार्थ्यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थींची निवड यादी तयार करण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातून पाच टक्के स्वनिधीतून दिव्यांग लाभार्थीना वैयक्तिक व सामूहिक योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मूक- बधीर विद्यार्थ्यांच्या हस्ते लाभार्थींची नावे चिठ्ठी टाकून निवडण्यात आली.
समता शिक्षण प्रसारक मंडळाचे मूक-बधीर विद्यार्थी धनश्री कणसे, साक्षी शिर्के,सर्वांगी पोतदार, प्रीत कांबळे, वेदांत लोहार यांनी लाभार्थींच्या नावाच्या चिठ्ठ्या काढल्या. यावेळी पालकमंत्र्यांसह गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधइकारी संजय भागवत, आ. दीपक चव्हाण, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी जगदाळे आणि समाजकल्याण अधिकारी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन शाळेत पाठवा, असे आदेशही मंत्रिमहोदयांनी दिले.