आकाश दडस
बिदाल – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माण-खटाव या तालुक्यांमधील तरुणांच्या रोजगाराचा मुद्दाच माण मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे.
गेली दहा वर्षे माण तालुक्यातील विधानसभा व इतर सर्व निवडणुकांमध्ये विकासाचे मुद्दे गाजत असले तरी सध्या विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. गेल्या 40 वर्षांपासून माणच्या उत्तर भागातील गावांच्या पाण्याचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाण्याचे राजकारण होत होते. याला माण-खटावची जनता कंटाळली आहे. कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरा, पण तालुक्याचा विकास करा, अशी मागणी जनतेतून होत आहे. या दोन्ही
तालुक्यांमध्ये उच्च शिक्षण घेतलेले हजारो तरुण बेरोजगार आहेत.
आधीच शिक्षणावर लाखो रुपये खर्च झाला असताना व्यवसायासाठी लाखो रुपये आणायचे कुठून? कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आणि पाण्याअभावी तो व्यवसाय चालला नाही तर काय करायचे, हे प्रश्न तरुणांना भेडसावत आहेत. फलटण, कराड, बारामती या शहरांमध्ये औद्योगिक वसाहती चांगल्या आहेत. तेथे अनेक कंपन्यांमध्ये तरुणांना रोजगार मिळाले आहेत. मग, माणमध्ये हे का होऊ शकत नाही, हा प्रश्न जनतेला पडला आहे. माण तालुक्यात युती सरकारने शेवटच्या महिन्यात म्हसवडजवळ एमआयडीसी सुरू करण्यासाठी निधी मंजूर केला. मात्र, एमआयडीसी उभारल्यानंतर स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार का, हा प्रश्न आहे. माणमधील राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरले आहेत.