कीर्तनकार, क्लासवाले, संगीत विशारदांवर आली हेल्पर म्हणून काम करण्याची वेळ
जाधववाडी – करोना महामारीने आज संपूर्ण विश्वाला मोठे आर्थिक ग्रहण लावले आहे. कित्येकांवर आपली नोकरी, धंदा, व्यवसाय यावर पाणी सोडून रोजगारासाठी दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. संगीत, कला, शिक्षण, क्लास, कीर्तन या क्षेत्रांना मरण नाही. त्यांच्यावर कधी उपासमारीची वेळ येणार नाही. अशी बऱ्याच जणांचा समज होता. परंतु पुणे जिल्ह्यात आळंदी, देहू ही दोन मोठी तीर्थक्षेत्र आहेत.
तेथे कला क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. परंतु तीन महिन्यांपासून कार्यक्रम, क्लास बंद असल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पांढऱ्याशुभ्र कपड्यात आणि नेहमी आनंदी जीवन जगणाऱ्या या कलाकारांवर आज बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
आळंदी येथील विश्रांत वड येथे राहणारे संगीत विशारद भरत गोडसे व देहू गावात राहणाऱ्या संगीत विशारद चंद्रकला खोसे यांच्या प्रभातच्या प्रतिनिधीनी चर्चा केली असता हे भयान वास्तव समोर आले आहे. इतर वेळी समाजात मान, प्रतिष्ठा यवढेच नव्हे महाराज घरी आले तर मोठा पाहुणचार असणाऱ्या कला क्षेत्रातील व्यक्तींवर मात्र करोनामुळे आपली कला बाजूला सारून उदरनिर्वाहासाठी नोकरी शोधण्याची वेळ आली आहे. भरत गोडसे यांनी चाकणमधील एका कंपनीत बारा तास हेल्परचे काम मिळविले आहे. सकाळी सातला घर सोडून रात्री साडेनऊपर्यंत घरी येत असल्याने संगीत कलेचा ऱ्हास तर होणार नाही ह्याची भीती गोडसे यांना सतावत आहे, संगीतामध्ये रियाज महत्त्वाचा असतो.
परंतु पोटापुढे हे सर्व विसरून आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अशी नोकरी स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. बारा बारा तास काम केल्याने कलेवर कुऱ्हाड कोसळण्याची भीती त्यांच्या मनाला खात आहे. कामात मन लागत नाही तरीदेखील पोटाची खळगी भरण्यासाठी मनाविरुद्ध काम करण्याची वेळ आज अशा कलाकारांवर आली आहे. गोडसे यांनी संगीत क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले आहेत. क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी सध्या त्यांच्याकडे शिकत आहेत. परंतु करोनामुळे मार्चपासून क्लास बंद असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य देखील अंधारात आहे. हा क्लास डोळ्यादेखत बंद होऊ नये हीच मोठी खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच देहूच्या चंद्रकला खोसे ह्यांनीही अशीच खंत व्यक्त केली आहे. उद्योगनगरीत अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आळंदी नगर परिषद प्रशासनाने व देहू ग्रामपंचायतीने अशा उद्याचे कलाकार घडविणाऱ्यांकडे डोळझाक करून नये.
कलाकार नोकरीच्या शोधात
केवळ संगीत क्षेत्रालाच नव्हे तर अन्य क्षेत्रालाही करोनाचा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने लेखक, कवी, क्रीडा शिक्षक, कोचिंग क्लास, नाट्य क्षेत्र यांची देखील हीच अवस्था आहे. आळंदी, देहू येथे राहणारे कीर्तनकार मार्चपासून कार्यक्रम नसल्याने आर्थिक विवंचनेत आहेत. उदरनिर्वाह कसा करायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाली आहे. समाजात असलेली प्रतिष्ठा त्यांना इतर कामे करण्यापासून रोखत आहे. हरिकीर्तन सोडून उदरनिर्वाहासाठी कुठे तरी दोन पैशांची नोकरी सुविकारणे कठीण जात आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना समाजाने, शासनाने मदत करण्याची गरज आहे.