तिकीट तपासणी अभियानांतर्गत पुणे विभागात 9 कोटी 20 लाखांचा दंड वसूल
पुणे – पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज-कोल्हापूर या पुणे विभागातील मार्गांवर तिकीट तपासणी अभियान राबवण्यात आले. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत या अभियानांतर्गत सुमारे 1 लाख 78 हजार 650 प्रकरणांमध्ये सुमारे 9 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
यंदा एप्रिल ते सप्टेंबरमध्ये 82 हजार प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून 4 कोटी 63 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील वर्षी याच कालावधीत 1 लाख 63 हजार 594 प्रकरणांमध्ये 7 कोटी 79 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. त्यामध्ये 74 हजार प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले होते. त्यांच्याकडून 4 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता.
प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित प्रवाशाला दंडात्मक कारवाईसह कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊस्कर, अपर मंडल रेल्वे प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा, सहर्ष बाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन, सहायक वाणिज्य प्रबंधक एस. वी. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.