लखनौ – उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात या राजकीय दृष्टया महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२४ लोकसभा निवडणुकांची ही एकप्रकारे रंगीत तालीमच ठरणार असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज उत्तर प्रदेशात बूथ विजय अभियानाची सुरुवात केली. यावेळी बोलताना नड्डा यांनी राज्यात भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
“जवळपास सर्वच निवडणूकपूर्व सर्वेक्षणे उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय होणार असल्याचं निरीक्षण नोंदवत आहेत. केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर उत्तराखंड, गोवा, मणिपूर येथे देखील भाजप परत सत्तेत येईल.” असं नड्डा म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जातीवादाचे, धर्मवादाचे, घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता विकासाच्या राजकारणाचा बोलबाला आहे.”
“२०१७ विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपने ३२५ जागा जिंकल्या. २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील राज्यातील जनतेने भाजपच्या विकासाच्या राजकारणाला भरभरून आशीर्वाद दिला. भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतील हे सांगण्यास पुरेसा आहे.” असंही नड्डा म्हणाले.
राहुल गांधींवर निशाणा
“आपल्याकडे असे राजकारणी आहेत जे संसदीय अधिवेशन सुरु असताना परदेशवारीवर जातात. देशात जेव्हा करोना विषाणू संकट आले तेव्हा भाजप वगळता इतर सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नेते लॉकडाऊनमध्ये, क्वारंटाईनमध्ये गेले. भाजप कार्यकर्त्यांनी मात्र समाजसेवा कर्त्यव्य मानून गरजवंतांना मदत केली.” असं म्हणत नड्डा यांनी राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला लगावला.
It is a matter of pride for us that under the leadership of PM Modi, the politics of casteism, familialism, dynasty and communalism in the country has been brought to an end and the politics of development has become popular: BJP national president JP Nadda pic.twitter.com/ykmKe7gp0r
— ANI (@ANI) September 11, 2021