नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज शेतकरी संघटना आपले आंदोलन आक्रमक करण्यासाठी नव्या रणनीतीची आखत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने उद्या होणाऱ्या बैठकीपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषी कायदे रद्द करता येणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आता उद्याच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://www.facebook.com/ANINEWS.IN/posts/3525583107554427
सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या कृषी कायदयावर दिलेल्या स्थगितीच्या आदेशानंतर देशात कृषी कायदे सध्या तरी लागू करता येणार नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. तसेच १९ जानेवारी म्हणजेच उद्या शेतकऱ्यांसोबत सरकारची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत कायद्याच्या कलमनिहाय चर्चा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो असे तोमर यांनी म्हटले. त्याबरोबरच त्यांनी कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येणार नसल्याचे तोमर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. कायदे रद्द करण्याच्या मागणी व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी त्यांना काय हवे आहे हे सरकारला सांगावे असे देखील तोमर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पार पडलेली बैठक निष्फळ ठरली आहे. पुढील बैठक 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. तीन केंद्रीय मंत्र्यांसोबत शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत शेतकरी तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिले. तर केंद्र सरकार कायदे रद्द न करता त्यामध्ये काही बदल करण्याच्या मागणीवर ठाम होते. जवळपास पाच तास चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही.