बंगळुुरू – पंतप्रधान मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेची जी अक्षम्य हेळसांड झाली त्यातून देशापुढील लोकांच्या समस्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, 23 कोटी लोक पुन्हा दारिद्य्ररेषेखाली गेले आहेत, असा दावा कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे.
कॉंग्रेस नेत्यांनी देशभर मोदी सरकारचे अपयश आणि देशातील महागाईच्या प्रश्नांवर पत्रकार परिषदांचे आयोजन करण्याचे योजले आहे. त्या उपक्रमांतर्गत सुप्रिया श्रीनेत यांची आज येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, लोकांवर इतकी बिकट परिस्थिती या सरकारमुळे ओढवली आहे की, लोकांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील सुमारे सव्वा लाख कोटी रुपये दैनंदिन खर्च भागवण्यासाठी काढून घ्यावे लागले आहेत.
देशातील सर्वच जीवनावश्वक वस्तूंचे भाव वाढले आहेत. गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. किरकोळ महागाईचा दर 6.3 टक्क्यांवर गेला असून, ही सर्व अभूतपूर्व स्थिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या महगाईला बऱ्याच अंशी चुकीची जीएसटीही कारणीभूत आहे, असेही सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे.