महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांची बोलती बंद
पुणे – अंगणवाडीचे बांधकाम झाले नसताना त्यावर दुरुस्तीचा खर्च टाकण्याचा “महाप्रताप’ महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी केल्याचा गौप्यस्फोट बुधवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी केला. त्यावर संबंधीत अधिकाऱ्याला जाब विचारला असता त्यांची बोलती बंद झाली.
ही बैठक अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी पुरंदर तालुक्यातील सदस्यांनी गेल्या तीन वर्षांत मंजूर आणि जुन्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची 25 टक्केही कामे झाली नसल्याकडे लक्ष वेधले. त्यावेळी सदस्य दत्ता झुरुंगे यांनी अंगणवाडी खोली नसताना त्यावर दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आणले. यामुळे महिला आणि बाल विकास विभागाचा गलथान कारभार समोर आला.
जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या झाडाखाली, पारावर, चावडीत किंवा मंदिरांमध्ये भरत असल्याने नव्याने खोल्या बांधण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने मोठा निधी उपलब्ध करून दिला. परंतु, जिल्ह्यातील जवळपास 27 ठिकाणी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम झाले नसताना त्यावर दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला, असा आरोप झुरुंगे यांच्यासह अन्य सदस्यांनी केला.
याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांना विचारणा केली. परंतु त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सर्वसाधारण सभेमध्ये याचा निर्णय करावा, असा आग्रह धरला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दराराच राहिला नाही…
महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी कार्यालयात बसून विभागाचा कारभार चालवत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी करून, अपूर्ण कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले नाही. तर दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेदेखील अधिकाऱ्यांबाबत मवाळ भूमिका घेत असल्याने अधिकाऱ्यांचे फावते. बेजाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल, त्याचवेळी अधिकारी सुतासारखी सरळ कामे करतील, असे सदस्य व गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.