मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले त्याला बरीच वर्षे झाली. आता मंगळ, शुक्र या ग्रहांचे वेध मानवाला लागले आहेत. अंतराळ आणि एकंदरीतच विज्ञान तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली असतानाही पृथ्वीवरील काही गूढ, रहस्यमय ठिकाणांचे कोडे उलगडण्यात मानवाला यश आलेले नाही. यापैकी एक म्हणजे कैलास पर्वत. कैलास हा एक मानवनिर्मित पिरॅमिड असावा येथपासून हा पृथ्वीचा मध्यबिंदू असावा इथपर्यंत अनेक दावे केले गेले आहेत. पण सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आजअखेर तरी या पर्वताच्या शिखरावर कोणीही पोहोचू शकले नाही, असे म्हटले जाते. काय आहे यामागचे रहस्य?
हिंदू धर्माच्या दृष्टीने कैलास-
मानसरोवर हे एक अत्यंत पवित्र क्षेत्र मानले जाते. मानसरोवर हे तिबेटमधील एक सरोवर असून, 320 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे सरोवर विस्तारलेले आहे. या सरोवराच्या उत्तरेला कैलास पर्वत आणि पश्चिमेला राक्षसतल आहे. राक्षसतलाची समुद्रसपाटीपासूनची उंची 4556 मीटर इतकी असून, त्याची त्रिज्या सुमारे 88 किलोमीटर एवढी आहे. हे राक्षसतल सुमारे 99 मीटर खोल आहे. हिंदू धर्मग्रंथांमधील उल्लेखांनुसार शंकर महादेवांचे ध्यानधारणा करण्याचे ठिकाण म्हणजे कैलास पर्वत होय.
तिबेटमधील बौद्धांच्या श्रद्धेनुसार, परम आनंदाचे प्रतीक असलेले डेमचोक (धर्मपाल) हे कैलास पर्वताचे अधिष्ठाते देव आहेत. जैन धर्माचे अनुयायी कैलास पर्वताला अष्टापद नावाने ओळखतात. जैनधर्मीयांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी याच पर्वतावर निर्वाणाची प्राप्ती केली असे मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार, ब्रह्मदेवांनी त्यांच्या मनातील इच्छेनुसार मानसरोवराची निर्मिती केली. मानस अधिक सरोवर म्हणजे (ब्रह्मदेवांच्या) मनातील सरोवर असा मूळ शब्द असून, “स’चा श्लेष झाल्यामुळे मानसरोवर असे नाव पडले. देवी सतीच्या शरीरापासून उजवा हात अलग होऊन येथे पडला होता. त्यामुळे येथील एका पाषाणाच्या शिळेला त्याचे रूप मानून पूजन केले जाते. शिवपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण आदी ग्रंथांमध्ये कैलासाचा महिमा वर्णन केला आहे. पौराणिक कथांनुसार, ही कुबेराची नगरी आहे. विष्णूदेवांच्या हातातून निघणारी गंगा कैलासाच्या शिखरावर पडते आणि तिथे महादेव तिला जटांमध्ये धारण करून प्रवाहित करतात, असे वर्णन आहे. कैलासाच्या वर स्वर्ग आणि तळाशी मृत्युलोक आहे, असे मानले जाते.
कैलास पर्वत हे एक गूढ आहे. या पर्वताबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. परंतु आजतागायत कोणीही कैलास पर्वताच्या शिखरावर पोहोचू शकला नाही. ज्याने तसा प्रयत्न केला, त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जाते. कैलासाशी संबंधित दंतकथांचा शोध घेण्यासाठी 1999 मध्ये रशियातील नेत्रतज्ज्ञ अर्नेस्ट मुल्दाशिफ यांनी त्या परिसरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एक टीम तयार केली. गिर्यारोहकांच्या या टीममध्ये भूविज्ञान, भौतिकशास्त्र आणि इतिहासकारांचा समावेश होता. अर्नेस्ट मुल्दाशिफ यांनी असा दावा केला की, कैलास हा एक प्रचंड मोठा मानवनिर्मित पिरॅमिड आहे आणि त्याची निर्मिती प्राचीन काळात करण्यात आली. हा पिरॅमिड अनेक छोट्या-छोट्या पिरॅमिड्सनी घेरलेला आहे आणि हे पारलौकिक क्रियाप्रक्रियांचे केंद्रस्थान आहे.
एवढेच नव्हे तर हा पिरॅमिड गीजा आणि टिओथ्युआकान या मेक्सिकोतील पिरॅमिडशी जोडलेला आहे. परंतु डॉक्टरांचा हा दावा नंतर रशियन-इंग्रजी द्विभाषिक वेबसाइटने खोडून काढला. कैलासाबद्दलचे गूढ वाढण्यास त्यासंबंधी प्रचलित असलेल्या गूढ कथा कारणीभूत आहेत. एका गिर्यारोहकाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, या पर्वतावर राहणे अशक्य होते. कोणत्यातरी गूढ कारणाने येथे दिशाभ्रम होतो. म्हणजेच दिशा समजत नाहीत. चुंबकीय तंत्रज्ञानाने तयार केलेला कंपासदेखील तेथे व्यवस्थित काम करत नाही. शरीरावरील केस आणि नखे अधिक वेगाने वाढू लागतात. तेथील रेडिओऍक्टिव्ह लहरी तीव्र आहेत.
दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव ही पृथ्वीची दोन टोके आहेत. या दोन्हीचा मध्यबिंदू हिमालय आणि हिमालयाचा मध्यबिंदू कैलास पर्वत आहे, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याला “ऍक्सिस मुंडी’ म्हणजेच जगाची नाभी असेही म्हटले जाते. म्हणजे आकाशातील ध्रुव आणि भौगोलिक ध्रुवाचे केंद्र. हा दहा दिशांचा मीलनबिंदू असल्याने तिथे अलौकिक शक्तींचा प्रवाह असतो आणि त्या शक्तींशी आपण संपर्क करू शकतो, अशीही मान्यता आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे कैलासाला विशाल पिरॅमिड मानणारेही असून, हा पिरॅमिड शंभर छोट्या पिरॅमिडनी वेढलेला असल्याचे सांगितले जाते. हा पर्वत एकान्तात असून, आसपास दुसरा कोणताही मोठा पर्वत नाही.
कैलासावर आजतागायत कोणीच पोहोचू शकले नाही, असे सांगितले जात असले तरी अकराव्या शतकात तिबेटमधील बौद्ध योगी मिलारेपा यांनी कैलासावर जाण्यात यश मिळविले होते, असा दावा करणारा वृत्तांत रशियाच्या शास्त्रज्ञांनी “यूएनस्पेशल’ नियतकालिकात 2004 मध्ये प्रसिद्ध केला होता. मात्र, मिलारेपा यांनी स्वतः याबद्दल काहीही सांगितले नव्हते; त्यामुळे हेही गूढच ठरते. कैलासाजवळील मानसरोवराचा आकार सूर्यासारखा आहे तर राक्षसतल या सरोवराचा आकार चंद्रासमान आहे. ही सरोवरे चंद्र-सूर्याशी संबंधित असून, त्यांचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांशी आहे, असेही मानले जाते. दक्षिणेकडून पाहिले असता स्वस्तिकाचे चिन्ह पाहायला मिळते, असे सांगतात. ही सरोवरे नैसर्गिक आहेत की मानवनिर्मित, हेही अद्याप गूढच आहे.
कैलास पर्वताच्या चार बाजूंनी ब्रह्मपुत्र, सिंधू, सतलज आणि करनाली या चार नद्यांचा उगम होतो. याच नद्यांमधून पुढे गंगा, सरस्वती यांसह चीनमधील सर्व नद्यांचा उगम झालेला आहे. कैलासाच्या चारही बाजूंना वेगवेगळ्या जनावरांची मुखे आहेत आणि तेथून या नद्यांचा उगम होतो. पूर्वेला अश्वाचे, पश्चिमेला हत्तीचे, उत्तरेला सिंहाचे तर दक्षिणेला मोराचे मुख आहे, असे सांगितले जाते. कैलास पर्वतावर केवळ पुण्यात्मेच वास्तव्य करू शकतात अशीही धारणा आहे. तिबेटच्या मंदिरांमधील धर्मगुरूंनी रशियन शास्त्रज्ञांना सांगितले होते की, कैलासाच्या आसपास अलौकिक शक्तींचे प्रवाह असून, आजही तपस्वी आणि आध्यात्मिक गुरू या परिसरात टेलिपथीद्वारे संवाद साधतात. हिमालयात राहणाऱ्या तथाकथित “येती’ या हिममानवाच्या अनेक गूढ कहाण्या प्रसिद्ध आहेत. हा प्राणी लोकांना मारून खातो, असे सांगितले जाते.
हिमालयाच्या परिसरात हिममानव असल्याचा दावा जगातील तीसपेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी केला आहे. कैलास, मानसरोवराच्या परिसरात सातत्याने एक आवाज ऐकू येतो. जणूकाही जवळून विमान जात असावे असे वाटते. परंतु लक्षपूर्वक ऐकल्यास “ओमकार’ किंवा “डमरूचा नाद’ ऐकू येतो, असे सांगितले जाते. काही शास्त्रज्ञांच्या मते हा आवाज बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेचा असू शकतो तर काहीजण हा आवाज प्रकाश आणि ध्वनीच्या संगमातून निर्माण होत असावा, असे मानतात. कैलास पर्वतावर आसमंतात सात प्रकारचे प्रकाशलोट चमकताना दिसल्याचाही दावा केला जातो. हा प्रकाश कैलास पर्वतावरील चुंबकीय शक्तीमुळे दिसत असावा असे नासाच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. या चुंबकीय शक्तीचा आसमंतातील घटकांशी संपर्क आल्याने या गूढ प्रकाशाप्रमाणेच अनेक गोष्टींची निर्मिती होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
कैलास यात्रेला जाणारे यात्रेकरू पर्वताच्या पायथ्याचेच दर्शन घेतात. कैलासाचा आकार महादेवांचे दर्शन घडविणारा असून, त्यामुळे मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. कैलास पर्वताची उंची 6600 मीटरपेक्षा अधिक आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा हा पर्वत 2200 मीटरने लहान आहे. परंतु एव्हरेस्टवर आजअखेर 7 हजारांपेक्षा अधिक गिर्यारोहकांनी चढाई केली असली, तरी कैलास पर्वत अजिंक्य आहे. अनेकदा प्रयत्न करूनही कोणी कैलासावर पोहोचू शकलेला नाही. कैलासाविषयी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनीही या पर्वतावर चढाई करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. रशियन गिर्यारोहक सरगे सिस्टियाकोव यांनी म्हटले आहे, “”जेव्हा मी पर्वताजवळ पोहोचलो तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली. आजवर ज्या पर्वतावर कोणी पोहोचू शकले नाही, त्या पर्वतासमोर मी उभा होतो. अचानक मला खूप अशक्तपणा जाणवू लागला आणि इथे फार काळ थांबता कामा नये, असे वाटू लागले. जसजसे आम्ही पर्वतापासून दूर आलो तसतसे मन हलके झाले.”
सुमारे 18 वर्षांपूर्वी 2001 मध्ये कैलासावर चढाईचा प्रयत्न झाला होता. चीनने स्पेनच्या गिर्यारोहकांना तशी परवानगी दिली होती. परंतु जगभरातील श्रद्धाळूंच्या म्हणण्यानुसार, हे एक पवित्र स्थळ असून, तेथे चढाईची अनुमती देणे गैर आहे. त्यानंतर कैलासाच्या मोहिमांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली. चीनकडून बंदी घातल्यामुळे कैलास यात्रा रद्द झाल्याने वादही निर्माण झाले होते. नैसर्गिक कारणांमुळे ही बंदी घातल्याचा चीनचा दावा असला तरी चीनचे विस्तारवादी धोरणच त्याला जबाबदार असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक