अकोले (प्रतिनिधी) – राजूरच्या रहिवासी पण राज्यस्थानमधून आलेल्या महिलांना राजूरमधील वसतिगृहामध्ये होम क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर या वसतीगृहाची अस्वच्छता चव्हाट्यावर आली. पहिल्यांदा वसतिगृहाची स्वच्छता करा, अन्यथा महिलांच्या संयमाचा बांध फुटेल, असा इशारा या महिलांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशात करोनाची लाट सुरू होण्यापूर्वी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे काही सदस्य राजस्थान राज्यातील माऊंट अबू येथे गेले होते. मात्र देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्याने त्या महिला तेथेच अडकून पडले होते. जिल्ह्यातील ते सर्व भक्त शुक्रवारी रात्री दि. 1 मे रोजी अकोले तालुक्यात आल्यावर त्या प्रवाशांची आरोग्य विभागाने तपासणी केली. त्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना प्रशासनाच्या निगराणीखाली राजूरच्या आदिवासी प्रकल्पाच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.
विठा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी त्या होम क्वारंटाईन केलेल्याची आरोग्याची तपासणी करून काळजी घेत आहेत. तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरूनच करण्यात आली आहे. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नाही ही दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
मात्र राजूर मधील आदिवासी प्रकल्पाच्या वसतिगृहाची अवस्था दयनीय झाली आहे. स्नानगृह व शौचालयाची सुविधा असली तरी त्यांची दुरवस्था झाली असून मोठी दुर्गंधी येत आहे. राहण्यासाठी असलेल्या वसतिगृहातील खोल्यांची स्वच्छते अभावी दुरवस्था झाली आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य व धुम्रपान केल्याने ठेवण्यात आलेल्यांना जीव मुठीत धरून दुर्गंधीत रहावे लागत आहे.
पिण्यासाठी व स्नान करण्यासाठी पाणी नसल्याने प्रशासनाने पाण्याचा टॅंकर बोलवून सुविधा केली. तर वसतिगृहातील तळमजल्यात असलेल्या वाचनालय खोलीमध्ये सहा महिला रहात आहेत.
या वसतिगृहाचा कोणी कर्मचारी उपस्थित नसल्याने अखेर तहसील विभागाने कार्यालयातील एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. तर या सर्व प्रकाराबाबतची माहिती अकोले पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय देशमुख यांना समजताच त्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वसतिगृहाला आरोग्य सेवकासह भेट देऊन पाहणी केली असता शौचालय गृह व स्नानगृह खोल्यांची व परिसरात अस्वच्छता पाहून तीव्र संताप व्यक्त करत प्रकल्पाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबतची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे उपसभापती देशमुख यांनी सांगितले.