वर्ष वाया जाण्याची विद्यार्थ्यांमध्ये भीती; शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर दबाव
पुणे – राज्यात शाळा व महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी फेरपरीक्षांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावीच्या नियमित परीक्षा घेण्यात येतात. बारावीचा निकाल मेअखेर, तर दहावी जूनमध्ये जाहीर होतो. दरम्यान, यंदा करोनामुळे निकालाच्या कामकाजावर परिणाम झाला. त्यामुळे निकाल उशिराने जाहीर झाले. त्यानंतर जुलै, ऑगस्टमध्ये फेरपरीक्षाही घेता आल्या नाहीत.
शालेय शिक्षण विभागाने 15 जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु करण्याचे स्पष्ट संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
फेरपरीक्षा होणार की नाही, कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. या परीक्षा होऊन त्यांचा निकाल लागल्यानंतरच पुढच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे. अन्यथा वर्ष वायाला जाण्याचा धोकाही आहे. विद्यार्थी, पालकांकडून परीक्षेबाबत राज्य मंडळ, विभागीय मंडळांकडे सतत विचारणा होत असल्याने अधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. राज्य मंडळामार्फत फेरपरीक्षेचे वेळापत्रक तयार करून त्यास शासन मान्यता मिळाल्यानंतरच होणार आहे.
इयत्ता दहावी, बारावी फेरपरीक्षा घेण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, तारखा अद्यापही निश्चित नाहीत. करोना आटोक्यात आल्यानंतर शाळा, महाविद्यालये उघडल्यानंतर व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतरच फेरपरीक्षा घेता येणार आहे.
– डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ