नवी दिल्ली: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने दिल्ली विद्यापीठाच्या आवारात स्वातंत्र्य वीर सावरकर, भगत सिंह आणि सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे बसवण्यात आले होते. तथापी हे पुतळे तेथे विद्यापीठाची अनुमती न घेताच बसवण्यात आले होते. त्यात विद्यापीठाने हस्तक्षेप करीत योग ती प्रकिया पार पाडून हे पुतळे पुन्हा बसवण्याचे आश्वासन दिल्यानंतर अभाविपनेच तेथील हे तिन्ही पुतळे हटवले आहेत.
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे मावळते अध्यक्ष शक्तीसिंह यांनी 20 ऑगस्ट रोजी हे तीन पुतळे तेथे उभारले होते. पण त्यांच्या प्रतिस्पर्धी विद्यार्थी संघटनेने त्यातील एका पुतळ्याची विटंबना केल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पण आता विद्यापीठाची रितसर अनुमती घेऊनच हे पुतळे पुन्हा तेथे उभारण्यात येतील अशी माहिती अभाविप संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. सध्या हे पुतळे विद्यापीठाच्या आवारातच सुरक्षित ठेवण्यात आले आहेत असेही संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.