वाहतूक विभागाचे दुर्लक्ष : वाहनचालकांना अपघाताचा धोका
चिंचवड – जुना पुणे-मुंबई महामार्गावर निगडीकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर काळभोरनगरजवळ अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड साहित्यांची वाहतूक करणारे छोटे मोठे टेम्पो पार्क केले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनाचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जुना पुणे-मुंबई मार्गावर काळभोरनगरजवळ टाटा मोटर्स कंपनीचे छोटा हत्तीचे शोरूम आहे. या शोरूममध्ये नवीन वाहने खरेदी करणे तसेच वाहनाची दुरुस्ती, देखभालीसाठी विविध भागांतून वाहनचालक, मालक आपली वाहने घेऊन येत असतात. शोरूमची पार्किंग व्यवस्था पुरेसी नसल्याने वाहनचालक आपली वाहने महामार्गावर पार्क करत आहेत. ही वाहने पार्क करताना व्यवस्थित पार्क केली जात नाहीत. त्यामुळे इतर वाहनचालकांना अडथळा येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवत आहे. शोरूमच्या मागेच वाहने दुरुस्ती केली जात असल्याने येथे नेहमीच वाहनांचा राबता असतो.
सकाळी वाहनचालक रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहने उभी करत असल्याने निगडी, आकुर्डी, थरमॅक्स चौक भागातून चिंचवड स्टेशन मार्गे पिंपरी, दापोडी, पुण्याकडे तसेच चिंचवड स्टेशन जवळील चिंचवड रेल्वे उड्डाण पुलावरून चिंचवडगाव, थेरगाव, डांगे चौक, हिंजवडीकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी, मध्यम, अवजड वाहनचालकांना येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या अनधिकृत पार्किंगमुळे येथे नेहमी छोटे मोठे अपघात होत आहेत.
महामार्गावरून येणारी वाहने वेगानी येत असतात. त्या वेळी वाहनचालकाच्या लक्षात आले नाही तर अशा पार्किंमुळे मोठा अपघात होऊ शकतो. परंतु अशा अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक विभागात लक्ष देताना दिसून येत नाही. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळेच अशा पद्धतीने मोठीची मोठी वाहनांची अनधिकृत पार्किंग येथे होत आहे. त्यामुळे येथील अनधिकृत पार्किंग करणारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.
पादचारी त्रस्त
महामार्गावरच अनधिकृत पार्किंग करत असल्याने पादचाऱ्यांना ये-जा करणे कठीण होत आहे. बऱ्याचदा पदपथावरदेखील गाड्या पार्क केल्या जात असल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याचा वापर ये-जा करण्यासाठी करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांची येथे मोठी वर्दळ असते. परंतु अनधिकृत पार्किंगमुळे पादचारी त्रस्त आहेत.