इशारा फलकही पळवला; प्रशासनाने घेतलीय गांधारीची भूमिका
सातारा (प्रतिनिधी) – जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठार परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. या घोषणेला आता दोन वर्ष होऊन गेली, मात्र “कास’ला लागलेले अनधिकृत बांधकामांचे ग्रहण काही सुटले नाही. उलट प्रशासनाच्या वतीने येथे लावण्यात आलेले चेतावणी फलक गायब झाले असून, बांधकामांना खतपाणी घातलं जातेय की प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सातारा जिल्हा जैवविविधतेने नटलेला आहे. रंगबिरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेले कास पठार हा त्याचाच एक भाग. या पठारावर लक्षावधी वनस्पती- प्राणीप्रजाती अधिवास करीत असून, पठाराला वनसंपदेचे वरदान लाभले आहे. पावसाळ्यानंतर पठारावर फुलणारी रंगबिरंगी फुले जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळेच कास पठाराची नोंद जागतिक वारसा स्थळात झाली आहे. मात्र, कास परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून लागलेला अनधिकृत बांधकामांचा विळखा सुटण्याएवजी तो अधिकच घट्ट होऊ लागला आहे.
कास पठार व तलाव परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी काहींनी यवतेश्वरच्या पुढे अगदी बामणोलीपर्यंत जागा खरेदी करून हॉटेल्स व निवासस्थाने बांधली आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. कास पठाराचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याने येथे विनापरवाना बांधकाम करता येत नाही. तरीही अनेकांनी अनधिकृत बांधकामे करून व्यवसाय सुरू केले आहेत.
तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यासह कास परिसराला भेट देऊन अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे केला होता. या भेटीत अनेक बांधकामे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, या नोटीसींचे पुढे काय झाले, या प्रश्नाचे उत्तर कधी समोर आलेच नाही. शिवतारे यांनी कास येथे नव्याने बांधकामे होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचा इशारा दिला होता. मात्र, तो केवळ फुसका बारच ठरला.
दोन वर्षांपूर्वी केलेल्या या सर्व घोषणा हवेतच विरल्या असून प्रशासनाच्यावतीने कास परिसरात लावण्यात आलेले चेतावणी फलकही अज्ञातांकडून हटविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतल्याने आता पुन्हा एकदा कास परिसरात राजरोसपणे बांधकामे सुरू आहेत. साताऱ्याचे नूतन जिल्हाधिकारी याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.