तळवडेगावचा विलास लांडेंना आमदार करण्याचा निर्धार
पिंपरी – महापालिकेने समाविष्ट गावांना चुकीच्या पद्धतीने मिळकतकराची आकारणी केली होती. विलास लांडे हे आमदार असताना समाविष्ट गावांचा तब्बल 72 कोटींचा मिळकतकर राज्य सरकारकडून माफ करून आणला. सामान्यांना अशा प्रकारे दिलासा देणारे लांडे हे शहरातील एकमेव आमदार आहेत. मात्र त्यांनी त्याचे मार्केटिंग करून राजकीय लाभ उठविला नाही. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर यांसारखे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची धमक केवळ लांडे यांच्यामध्येच आहे.
सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे, शास्तीकर या प्रश्नांचे नुसते गाजर दाखविले आहे. हे प्रश्न सुटल्याचे खोटे सांगून पुन्हा मते मागत आहेत. मात्र तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगरमधील जनतेने अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी विलास लांडे यांना विजयी करून पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला आहे, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी बुधवारी सांगितले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर व परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यावेळी नगरसेवक प्रवीण भालेकर बोलत होते. विलास लांडे यांनी तळवडे गावच्या कमानीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि गावठाणातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरूवात झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, हभप शिवाजी नखाते, हभप रंगनाथ महाराज भालेकर, बाळासाहेब वाळुंज, मनसेचे विभाग प्रमुख विशाल मानकरी, सुजाता काटे, संगीता देशमुख, अरूण थोपटे, सुधाकर दळवी, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष सीेंप जाधव, हभप हरिभाऊ ताम्हाणे, अंकुश नखाते, तळवडे विका सोसायटी माजी चेअरमन तानाजी बाटे, कुंदन भालेकर, सुरेश चव्हाण, हिरामण नखाते, तुकाराम भालेकर आदी उपस्थित होते. तळवडे गावठाण, ज्योतिबानगर, गणेशनगर, रूपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर भागात पदयात्रा काढून ताम्हाणेवस्ती येथे समारोप करण्यात आला.
नगरसेवक प्रवीण भालेकर म्हणाले, भोसरी मतदारसंघातील काही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावांना आकारलेला मिळकतकर अन्यायकारक होता. विलास लांडे यांनी राज्य सरकारकडून समाविष्ट गावांचा तब्बल 72 कोटींचा मिळकतकर माफ करून आणला आणि समाविष्ट गावांतील नागरिकांवरील अन्याय दूर केला. अशा प्रकारचे काम करणारे लांडे हे शहरातील पहिले आमदार आहेत. या कामाचे विलास लांडे यांनी कधी मार्केटिंग करून राजकीय फायदा उठविला नाही. त्याची समाविष्ट गावांतील नागरिकांना आजही जाण आहे. समाविष्ट गावांतील नागरिक लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
…त्यामुळे लांडेंचा विजय निश्चित – भालेकर
तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर भागातील एकही अनधिकृत बांधकाम अधिकृत झालेले नाही किंवा एकाचाही शास्तीकर माफ झालेला नाही. हे दोन्ही प्रश्न सोडविण्याची हिंमत फक्त विलास लांडे यांच्यामध्येच आहे. मिळकतकर माफीसारखेच ते हे दोन्ही प्रश्न सोडवू शकतात. त्यासाठी लांडे यांनी पुन्हा आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची गरज आहे. त्यामुळे तळवडे, रूपीनगर आणि त्रिवेणीनगर भागातील जनतेने विलास लांडे यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तळवडेगाव ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहते, तो उमेदवार विजयी होतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे या निवडणुकीत लांडे यांचा विजय निश्चित प्रवीण भालेकर म्हणाले.