गोंदवले – माण तालुक्यात नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नुकसानीचे पंचनामे तात्काळ होणे गरजेचे असतानासुध्दा अजून काही ठिकाणी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक पोहचले नसल्याचे दिसत आहे. यावरुनच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यात हयगय होत असल्याचे दिसत आहे.
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. इथले पर्जन्यमान सरासरी 450 मिमी एवढे आहे. ऐन पावसाळ्यातसुध्दा अनेक ठिकाणी पाण्याचे टॅंकर प्रशासनामार्फत पोहचवावे लागत असतात. तर जनावरांना चारा मिळावा म्हणून चारा छावण्या सुरू कराव्या लागतात, अशी भीषण स्थिती या तालुक्यात असते. आता मात्र याच्या उलट परिस्थिती या ठिकाणी पहायला मिळत असून इथे 450 मिमी ऐवजी चक्क 1200 मिमी ते 1450 मिमी पर्यत पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे सर्व तलाव, ओढे, नदी, बंधारे असे पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. एवढ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले.
अजूनही अनेक शेतात पिकांमध्ये गुडघाभर पाणी आहे, त्यामुळे पिकेदेखील कुजून जाऊ लागली आहेत. मात्र, दावणीतील जनावरे चाऱ्यासाठी हंबरडा फोडत असल्याने गुडघाभर पाण्यात जीव धोक्यात घालून केवळ जनावरांसाठी हे शेतकरी चारा काढताना दिसत आहेत. वाघमोडेवाडी (ता. माण) येथे अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याचे समजत आहे. दहिवडी शहरापासून सुमारे 7 ते 8 किमी अंतरावर हे ठिकाण असूनसुध्दा त्यांच्या शेतात कोणही पंचनामा करायाला आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या येथील प्रांतअधिकारी अश्विनी जिरंगे यांनी नुकताच गेले काही दिवसांपासून कार्यभार स्वीकारला आहे, त्यांना आता ओल्या दुष्काळाच मोठे आव्हान असणार आहे, त्यांनी हे आव्हान स्वीकारून, जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे अगदी व्यवस्थित करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. दरम्यान, अशा दुर्लक्षित शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी अन् कर्मचारी पंचनामा करायला पोहचणार का? पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानी प्रमाणे पंचनाम्यावरही पाणीच फिरणार? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, त्या त्या प्रमाणे माहिती गोळा केली जात आहे. वाघमोडेवाडी मध्ये जर असा काय प्रकार झाला असेल तर मी स्वतः माहिती घेऊन संबंधित कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना विचारणा करणार आहे.
– अश्विनी जिरंगे सोनवणे प्रांताधिकारी माण खटावआमची शेती वाघमोडेवाडी या गावात आहेत. परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहेत. मात्र आमच्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी अजूनही कोणी प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आलेला नाही.
सुनंदा वाघमोडे शेतकरी वाघमोडेवाडी