मंचर – छत्री उघडल्यानंतर सोशल डिस्टन्स आपोआप तयार होते, तसेच उन्हापासून संरक्षणही होणार आहे, त्यासाठी मंचरकरांनी छत्रीसोबत संगत वाढवावी, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.
आंबेगाव तालुक्यातील शिनोली, साकोरे, निरगुडसर, वडगाव काशिंबेग, लांडेवाडीची पिंगळेवाडी, जवळेमध्ये एकूण आठ रुग्ण सापडले आहेत. या गावांमध्ये प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायोजना करत गावाच्या सीमा सील केल्या आहेत.
गावातील नागरिकांना बाहेर जाण्यास अथवा येण्यास बंदी आहे. मंचर शहरात दररोज गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसतो. बाधित रुग्ण गर्दीत मिसळला तर इतरांना प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या प्रत्येकाला सोबत छत्री घेऊन येण्याचे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे. सरपंच गांजाळे म्हणाले की, तालुक्यात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. कोणीही घराबाहेर शक्यतो पडू नका. छत्रीचा प्रयोग अनेक राज्यांत आणि देशांत यशस्वी झाला आहे.