बंडगार्डन, दौंड येथून भीमानदीत विसर्ग वाढल्याने धरण 75.97 टक्के भरले
भिगवण – पुणे शहरासह मावळ परिसरात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. उजनी धरण 76 टक्के भरले असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत 81 ते 80 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जाऊ शकेल. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले असून 32 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
उजनी धरणाची पाणीसाठा क्षमता 102.2 टीएमसी असून उपयुक्त साठ्याची टक्केवारी 73.78 इतकी झाली आहे. भीमा उपनद्यांवरील सर्व प्रकल्प सर्व क्षमतेने भरले असल्याने बंडगार्डन येथून 1 लाख 23 हजार 472 क्युसेकने तर, दौंडचा विसर्ग 2,16, 489 क्युसेकने उजनी धरणात पाणी येत आहे हा विसर्ग कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरेल.
पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण अत्यंत महत्त्वाचे आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 117 टीएमसी आहे. त्यापैकी 63.65 टीएमसी पाणीसाठा मृत पाणीसाठा आहे, तर 53.57 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. यंदा इंदापूर, दौंड तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आदी तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांची आशा उजनी धरणावर होती. लांबलेल्या पावसामुळे उजनी धरण मृतसाठ्यातून बाहेर येण्यास उशीर झाल्याने पाणलोट क्षेत्रातील खरीपाच्या पीक लागवडीवर मोठा परिणाम जाणवत होता.