मुंबई: यूजीसीच्या निर्णयानंतर विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेसंदर्भात राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने करोनाच्या संसर्गाचा धोका पाहता परीक्षा न घेण्याची भूमिका घेतील आहे, तर यूजीसीने राज्यांना परीक्षा घेण्याबाबत पत्र पाठवले आहे.
यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यूजीसीचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा आहे. महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा शक्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रातील करोनाची स्थिती आणि परीक्षांसाठीची संसाधने याबाबत लिहित सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुलगुरुंशी चर्चा केली होती. या बैठकीत करोनाचा संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना एकत्र जमवणे धोक्याचे होते, ते योग्य नव्हते म्हणून आपण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे उदय सामंत म्हणाले.