पुणे – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे गरजेचे आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे. दुसरीकडे यूजीसीसोबत पत्रव्यवहार करूनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सांगितल्याने परीक्षेसंदर्भात राज्यातील विद्यार्थ्यांमधील संभ्रम कायम राहिला आहे.
महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गुरुवारी कार्यपद्धती जाहीर केली. “यूजीसी’च्या निर्णयानुसार मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवत अंतिम वर्षाची परीक्षा येत्या 30 सप्टेंबरपर्यंत घेण्यात यावी, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटले आहे.
“यूजीसी’ने परीक्षांसाठी कार्यपद्धती (एसओपी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केली. करोनाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीचे सर्वांना पालन करावे लागेल. यामध्ये दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू ऍप अनिवार्य, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूची दुसरी लक्षणे आहेत. त्यांना दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे की नाही किंवा दुसऱ्या वर्गात बसू द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर परीक्षकांनाही मास्क आणि हातात ग्लोव्हज घालणे बंधनकारक असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. “यूजीसी’ने परीक्षांसाठीची कार्यपद्धतीचे पत्र देशातील विद्यापीठांना पाठवले आहे.
परीक्षांसाठीची कार्यपद्धती
– परीक्षार्थींना एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागेल.
– प्रत्येक परीक्षा केंद्रावर थर्मोगन उपलब्ध असेल.
– परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
– परीक्षार्थींना मोबाइलमध्ये आरोग्य सेतू ऍप अनिवार्य असेल.
– परीक्षा केंद्रातील परिसर निर्जंतुक केला जाईल.
– परीक्षा केंद्रांवर हॅंड सॅनिटायझर आणि हॅंडवॉश ठेवले जातील.