मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात व्यक्तिगत बैठक पार पडली आहे. या बैठकीवर आता केंद्रीयमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ कराव. भाजपसोबत सत्ता स्थापन करावी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, अशी आर्त हाक रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन करून भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी असल्याचे आठवले म्हणाले.
दरम्यान शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. त्यांनी भाजपसोबत येऊन मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिगत भेटीवर देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. या भेटीचं आम्ही स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.