– 30 वर्षांच्या मित्राने नाही पण विरोधकांनी माझ्यावर दाखवला विश्वास – उद्धव
मुंबई : शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचा नवा मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर मंगळवारी अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले. नव्या सरकारचा शपथविधी रविवार, 1 डिसेंबर रोजी दादर येथील शिवतीर्थावर होणार आहे. दरम्यान, ज्यांच्याशी तीस वर्षांपासून मैत्री आहे त्या पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला नाही. मात्र ज्यांच्याशी सामना केला त्या विरोधकांनी माझ्यावर विश्वास दर्शवला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. आज बाळासाहेब असते तर त्यांना आनंद झाला असता, असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला.
देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेला पुन्हा वेग आला. दिवभरातील राजकिय घडामोडीनंतर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांसह नवनिर्वाचित आमदारांची वांद्रे येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांचे ठराव मंजूर करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतृत्वपदी म्हणजेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आपल्या आभारपर भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपाचे टोला लगावला.
असा प्रसंग पुर्वी कधी माझयावर आला नव्हता. मला अशा पदावर बसायचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, जी काही शक्ती आहे ती सर्वसामान्यांसाठीच वापरायची अशी आमच्या आजोबांपासून परंपरा आहे. आज मला आश्चर्य याचे वाटते की गेली 30 वर्षे ज्यांच्यासोबत होतो त्यांनी विश्वास ठेवला नाही. ज्यांच्यासोबत 30 वर्षे सामना केला त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला. संघर्षाच्या काळात शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही, पण जेव्हा संघर्षात विजय होतो तेव्हा मात्र आवर्जुन त्यांची आठवण येते. आज शिवसेनेसाठी ज्या शिवसैनिकांनी कायम खस्ता खाल्लया त्या सगळयांना मी अभिवादन करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले. पहिल्यांदा या आखाडयात आलो असलो तरी मी मैदानातला माणूस आहे. या सरकारमध्ये आधीच्या सरकारमध्ये नसतील इतकी अनुभवी माणसे आहेत. केवळ सरकार म्हणून नाही तर एक कुटुंब म्हणून हे सरकार चालविणार आहोत. सर्वसामान्य माणसालाही हे सरकार आपले आहे असे वाटेल असेच काम करणार आहोत असे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले.
पण जे आडवे येतील त्यांना सोडणार नाही
माझे सरकार कोणाशीही सूडबुदधीने वागणार नाही पण जे आडवे येतील त्यांना सरळ करायला सगळे समर्थ असल्याचे सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपावर टीकास्त्र सोडले.मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला खिळे असतातच.जाणारा मुख्यमंत्री हा एखाद दोन जास्त खिळे लावून जातोच.पण असे खिळे ठोकायला आमच्याकडे मजबूत हातोडा आहे.मला देखील ही युती तोडताना मनातून यातना झाल्या.पण देवेंद्र फडणवीस यांनी जे वाक्य वापरले त्याने इंगळया डसल्या सारखे वाटले. सोनियाजींची लाचारी करतो असे ते म्हणाले. मातोश्रीतून बाहेर न पडणारे आज सगळीकडे जात आहेत असे ते म्हणाले.या सगळयांची उत्तरे मी कोणत्याही मैदानात उभा राहून देण्यास तयार आहे.पण ज्या मातोश्रीत जे आले.तिथे जे ठरले ते ठरलेच नाही असे साफ खोटे ते म्हणाले.अशा खोटारडयांची मी साथ देणार नाही.हे खोटे बोलणे हिंदुत्वात बसत नाही.बाळासाहेबांनी मला सांगितले होते एक तर शब्द देताना शंभर वेळा विचार कर.पण नंतर प्राण गेला तरी शब्द खाली पडू देउ नकोस. आज अवकाळीने राज्यातल्या शेतक-याच्या डोळयात जे अश्रू आहेत ते मी विसरू शकत नाही. सर्वसामान्य,शेतकरी यांच्यासाठीच आपले सरकार काम करणार आहे.त्यासाठी शरद पवार साहेबांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन कायम मिळणारच आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मोठया भावाला भेटायला दिल्लीत जाणार
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी मोठया भावाला भेटायला दिल्लीत जाणार असेही उदधव ठाकरे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारसभांमध्ये कायम उदधव ठाकरे यांचा “माझा लहान भाउ’ असा उल्लेख करायचे.हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला.
आज बाळासाहेब असते तर आनंद झाला असता – शरद पवार
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करताना शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. आज बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता असे सांगून शरद पवार म्हणाले, मी असेन, बाळासाहेब असतील… आम्ही दोघांनी एकमेकांवर टीका करण्यासाठी शब्दांची कधीच काटकसर केली नाही. पण इतके असूनही वैयक्तिक मैत्री, सलोखा कधी सोडला नाही. दिवसा सभेत एकमेकांचा समाचार घ्यायचो पण संध्याकाळी मातोश्रीवर जाउन मीनावहिनींच्या हातचे जेवणही घ्यायचो. आमचा प्रेमाचा संबंध कधीच तोडला नाही. बाळासाहेब असे नेते होते की ज्यांनी अतिशय लहान समाजातील छोटयातल्या छोटया कार्यकत्र्यांलाही मोठ केले. चंद्रकांत खैरेंसारख्या त्यांच्या समाजाचे दोन तीन हजार मतदारही मतदारसंघात नसताना 30 ते 35 वर्षे विधानसभा असेल वा संसद असेल… त्या पदांवर बसविले. गिरणगावातील छोटया कार्यर्कत्यांनाही मोठया पदांवर बसविले. हे काम केवळ बाळासाहेबच करू शकतात. बाळासाहेबांची हीच परंपरा उद्धव ठाकरेही चालवतील. राज्यातील शेवटच्या माणसाला हे सरकार आपले सरकार वाटेल असा विश्वास मला असल्याचेही शरद पवार म्हणाले.