जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी केली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस विक्रम पावस्कर, सदस्य अतुल भोसले, मनोज घोरपडे आदी उपस्थित होत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “”आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 200 हून अधिक आमदार आणि 45 हून अधिक खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असून महाराष्ट्रात तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष कसा होईल या दृष्टीने संघटनात्मक बांधणी सुरू आहे. या बांधणीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातूनच मी 24 जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला असून येत्या दहा डिसेंबरपर्यंत हा दौरा पूर्ण होणार आहे. या संघटनात्मक बांधणीमध्ये कार्यकारणी सदस्य प्रमुखापासून ते शक्ती संघटन केंद्र ते बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती आणि त्याचा प्रसार प्रचार केला जाणार आहे. राज्यातील दोन कोटी लोक “धन्यवाद मोदीजी’ असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिणार आहेत. गरीब कल्याण योजनेचा देशातील पाच कोटी 63 लाख नागरिकांना आत्तापर्यंत लाभ झाला आहे.”
ते म्हणाले, “बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याची आमची जोरदार तयारी आहे. निर्मला सीतारामन यांच्यानंतर बारामतीमध्ये लोकांशी संवाद साधण्यासाठी सातत्याने भाजपची संवाद रणनीती सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा विकास केला असला तरी तो शहराचा विकास आहे, बारामती मतदारसंघाचा नाही.
बऱ्याचशा भागांमध्ये सुप्रिया सुळे यांनी गेल्या आठ वर्षात संवाद देखील साधलेला नाही, हे आम्हाला गेल्या तीन महिन्यांच्या दौऱ्यामध्ये लक्षात आले.’ अजितदादा पुन्हा नॉट रिचेबल असून ते भाजपच्या संपर्कात आहेत काय, असा प्रश्न बावनकुळे यांना विचारला असता ते म्हणाले, “अजितदादा नेमके काय करतील हे मी काय सांगू शकत नाही. कारण ते काहीही करू शकतात.’ लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.
आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला उमेदवारसुद्धा मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.सातारा पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप पक्ष कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. दोन्ही आघाड्या विशेषतः खासदार उदयनराजे भोसले गट व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे – फडणवीस सरकारने करून दाखवले
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान कबर परिसरात असणारे अतिक्रमण काढण्यात आले, त्यासंदर्भात बावनकुळे यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच यासंदर्भात संघटनात्मक लढा देणाऱ्या सर्व संघटनांचा त्यांनी आदरपूर्वक उल्लेख करून त्यांना धन्यवाद दिले. शिंदे सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला त्याबद्दलही त्यांचे त्यांनी कौतुक केले. मताच्या लांगुलचालनासाठी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने अफजलखान कबरीचा प्रश्न जाणीवपूर्वक सोडवला नाही. मात्र, शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवले, या शब्दांत त्यांनी सध्याच्या सरकारचे कौतुक केले.