मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियोजित 24 नोव्हेंबरला होणारा अयोध्या दौरा काही काळासाठी लांबणीवर टाकला आहे. राज्यात सध्या सत्ता स्थापनेचा निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमिवर हा दौरा पुढे ढकलल्याची माहिती आहे. पुढचा दौरा कधी असेल याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
याशिवाय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अयोध्या प्रकरणाचा निकाल लागून काही दिवसच झाले आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यासाठी काही कायदेशीर अडचणी असल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र पुढील दौरा आखला जाईल त्यावेळी उद्धव ठाकरे सर्व खासदार-आमदार आणि मंत्रिमंडळ घेऊन जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यांची तारीख अद्याप घोषित झालेली नाही. राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर पुढील अयोध्या दौरा होईल, असे बोलले जात आहे.
दरम्यान, अयोध्या खटल्याच्या निकालानंतर गेल्या वर्षीप्रमाणे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा उद्धव यांनी केली होती. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण उद्धव ठाकरेंनी काढली होती. अयोध्येचा प्रश्न संपूर्ण देशभर घेऊन जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचीदेखील आठवण त्यांनी काढली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी आणि हजारो शिवसैनिक आयोध्येला गेलो होतो. सोबत शिवनेरी किल्ल्यावरची मूठभर माती घेऊन गेलो होतो. ती माती अयोध्येत ठेवून आलो. या मातीती एक शक्ती आहे. एका वर्षातच या मातीमुळे चमत्कार घडला आहे. येत्या 24 तारखेला मी पुन्हा अयोध्येला जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.