मुंबई – महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष एका टोकाच्या वळणावर येऊन पोहचला आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन्हही ठिकाणी सुरु असलेला हा संघर्ष केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशासाठी लक्षवेधी ठरत आहे. न्यायालयातील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी आज निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची ? आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार याबाबतची सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासमोर करण्यात आली आहे. त्याबाबत देखील आयोग काही भाष्य आज करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिववसेना पक्ष आणि चिन्हाबाबत १० जानेवारी रोजी या आधीची सुनावणी झाली होती. या सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या घटनेत बदल केल्याचा आक्षेप नोंदवला होता. तसेच ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने देखील त्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांवर आपला जबाब सादर करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पक्षाच्या फुटीच्या या वादात नेमकं कोणाचं पारडं जड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजची सुनावणी या संपूर्ण प्रकरणाला कितीपत पुढे घेऊन जाते याकडे देखील अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.